✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १२ मार्च २०२६
![]() |
| JSW स्टील उद्योगासाठी जमीन लिजवर देण्याच्या मागणीसंदर्भात गडचिरोली प्रेस क्लबसमोर गावकऱ्यांची उपस्थिती |
गडचिरोली जिल्ह्यातील डोंगरगाव, येवली, शिवनी वाकडी,मारकबोडी,मुडझा आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उद्योगासाठी आपली जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. JSW स्टीलसारख्या उद्योगाला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी गावकऱ्यांमध्ये लोकसंवादातून सकारात्मक भूमिका तयार झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित अनेक उद्योग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन विक्री न करता ती मासिक भाडे तत्वावर लिज पद्धतीने उद्योगाला देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. उद्योग चालू असेपर्यंत जमीन उद्योगाकडे राहील आणि उद्योग बंद झाल्यास ती पुन्हा मूळ मालकांना परत द्यावी अशी अट शेतकऱ्यांनी मांडली आहे.
संबंधित बातमी : गडचिरोलीतील अडपल्ली गावाचा मेटा स्टील प्रकल्पाला विरोध
सुरजागड परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन होत असून हजारो ट्रकद्वारे गिट्टी स्वरूपात खनिज बाहेर जिल्ह्यात आणि बाहेर राज्यात पाठवले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सध्या सुमारे ३५०० ट्रक वाहतूक होत असल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोलीतच उद्योग उभारणीची गावकऱ्यांची मागणी
उत्खननाच्या सध्याच्या वेगामुळे येत्या ५० वर्षांत नैसर्गिक संपत्ती संपून जाईल आणि गडचिरोली जिल्हा ओसाड होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. निसर्गसंपन्न जिल्ह्यातील जंगल, नद्या आणि पर्यावरणावर परिणाम होत असताना स्थानिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
![]() |
| गडचिरोली प्रेस क्लबमध्ये हेमंत भाऊ जम्बेवार यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांची पत्रकार परिषद |
गावकऱ्यांनी आता ठाम भूमिका घेत दर एकरी मासिक भाडे करारासह कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याची अट ठेवली आहे. जिथे उत्खनन होते तिथेच उत्पादन उद्योग उभारले जावेत या तत्वावर आम्ही जमीन देण्यास तयार आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच पुढील ३० दिवसांत कोणताही खनिज ट्रक बाहेर जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर जाऊ देणार नाही असा इशाराही गावकऱ्यांनी दिला. कोनसरी, सुरजागड किंवा हेडरी परिसरात बाहेरील व्यक्तींना दिलेला रोजगार तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान गडचिरोली प्रेस क्लब येथे दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या वतीने हेमंत भाऊ जम्बेवार यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका मांडण्यात आली. या वेळी मुडझा, येवली, शिवनी, वाकडी, गोविंदपूर, मारकबोडी तसेच परिसरातील गावकरी उपस्थित होते आणि गावकऱ्यांच्या वतीने हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आले.
हेही वाचा : गडचिरोलीतील एलटीबी बेव्हरेजेस इथेनॉल प्रकल्पाची जनसुनावणी स्थगित
या पत्रकार परिषदेत चरणदास बाजीराव बोरकुटे, देवराव कवडूजी पाल, अज्ञान नारायण पाल, तात्याची नागाजी दिवटे, बाळकृष्ण बाजीराव बोरकुटे, महेश डंबाजी राऊत, उमाकांत लालाजी हर्ष, नेपाल राजाराम माधमवार, वैभव कामराज बांबोळे, अरविंद देवराव बावणे, वेदांत कृष्णा बावणे, प्रकाश नामदेव चौधरी, योगराज नक्टूजी रामटेके, प्रमोद बाबुराव सोदुरवार, मुकरू नामदेव बोभाटे, रोशन प्रकाश चौधरी, लोमेश आनंदराव जेगंटे, जगदीश राजू लोनबले यांसह अनेक गावकरी उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने श्रीदेवी अविनाश वरघंटीवार महिला आघाडी जिल्हाप्रमुख, वसंत गावतुरे तालुकाप्रमुख गडचिरोली आणि शितल घनश्याम बनसोड शहर प्रमुख हेही उपस्थित होते


