✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 १७ मार्च २०२६
![]() |
| राज्यात गॅस तुटवड्यामुळे नागरिकांसमोर निर्माण झालेली परिस्थिती दर्शवणारे प्रतिनिधिक दृश्य |
राज्यात सध्या गॅस सिलिंडरचा प्रश्न डोकेदुखी बनलाय. अनेक ठिकाणी सिलिंडर बुक केल्यावरही वेळेवर मिळत नाही, त्यामुळे सामान्य नागरिकांपासून हॉटेल व्यवसायिकांपर्यंत सगळेच अडचणीत आले आहेत. यामागे आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम पुरवठ्यावर होत असल्याचं समोर येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली. गॅसला पर्याय म्हणून पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध करून देण्याची योजना सरकारच्या विचाराधीन असून त्यासाठी तयारी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. म्हणजेच, गॅस मिळण्यात अडचण आली तर नागरिकांसाठी दुसरा पर्याय तयार ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरकारकडून या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत बैठका घेतल्या जात आहेत. कुठे जास्त तुटवडा आहे, कुठे पुरवठा अडकतोय, याचा रोज आढावा घेतला जातोय. न्यायालयालाही या स्थितीबाबत माहिती देण्यात आली असून प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत.
गॅस कोणाला आधी? सरकारने ठरवला स्पष्ट प्लॅन
सध्या उपलब्ध गॅस मर्यादित असल्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम ठरवला आहे. रुग्णालये, शाळा, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम यांना सर्वप्रथम गॅस पुरवठा केला जातोय, कारण या सेवा थांबल्या तर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यानंतर पोलीस, रेल्वे, सरकारी विभाग यांना काही प्रमाणात गॅस दिला जातोय. हॉटेल्स, उद्योग आणि इतर क्षेत्रांसाठी मात्र मर्यादित पुरवठा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी व्यावसायिकांना अडचणी येत आहेत.
दरम्यान, गॅस उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जातोय. रिफायनरीमधील उत्पादन वाढवण्यात आलं असून जिल्हास्तरावर कंट्रोल रूम आणि विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. काळाबाजार थांबवण्यासाठी तपासण्या सुरू असून अनेक ठिकाणी सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
एकूणच पाहिलं तर परिस्थिती अजून पूर्णपणे सुरळीत नाही, पण सरकार आणि यंत्रणा ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील काही दिवस नागरिकांनी थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे.

