✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०३ मार्च २०२६
![]() |
| कोरची तालुक्यात वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून पुतण्याचा खून; दोन वर्षांनंतर पोलिसांनी काका व साथीदाराला अटक (प्रतिकात्मक चित्र) |
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आंबेखारी गावात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका रहस्यमय बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या हिस्स्यावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सख्ख्या काकानेच पुतण्याचा जीव घेतल्याचे समोर आले असून पोलिसांनी काकासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
२७ नोव्हेंबर २०२४ रोजी गावातील दुलमाबाई कडयामी या जंगलात केरसुणीचे गवत आणण्यासाठी गेल्या असता त्यांना जमिनीत अर्धवट पुरलेला सांगाडा दिसला. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला हा प्रकार गूढ होता. मात्र पुढील तपासात सांगाड्याचे अवशेष डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले. अहवाल आल्यानंतर तो सांगाडा महेश शामसाय कडयामी (२३) याचाच असल्याचे निश्चित झाले.
हे सुद्धा बघा :- अलीकडेच पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्र बदली प्रकरण ग्रामसभेनंतर समोर आले होते.
या निष्कर्षानंतर पोलिसांनी तपासाची दिशा कौटुंबिक वादाकडे वळवली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, महेश हा आपल्या वडिलांकडे आणि मोठ्या वडिलांकडे जमिनीचा हिस्सा मागत होता. जुलै २०२४ मध्ये याच मुद्द्यावरून त्याचे मोठे वडील रामदास अमरु कळयामी यांच्याशी जोरदार भांडण झाले होते. गावातही या वादाची चर्चा होती.
जमिनीच्या वादातून घेतला टोकाचा निर्णय
त्या दिवशी दुपारी वाद झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा बाचाबाची झाली. त्यानंतर महेश मित्रासोबत मासेमारीसाठी गेला होता. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रामदास कळयामी आणि त्याचा साथीदार दसरु ठाकूरराम कल्लो यांनी कुऱ्हाड घेऊन महेशचा पाठलाग केला. जंगलात नेऊन त्याच्यावर वार करण्यात आल्याची कबुली दोघांनी दिली आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी सी-६० जवान दीपक मडावी शहीद प्रकरणात प्रशासनाने मदतीची घोषणा केली होती.
खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुऱ्हाड धुतल्याची बाबही तपासात उघड झाली. घटनेनंतर प्रकरण काही काळ शांत राहिले. मात्र सांगाडा सापडल्यानंतर आणि डीएनए अहवालानंतर पोलिसांनी धागेदोरे जोडत अखेर दोघांना अटक केली.
या संपूर्ण कारवाईत पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सखोल तपास करत दोन वर्षांपासून दडलेले सत्य बाहेर आणले. कौटुंबिक वाद किती भयंकर वळण घेऊ शकतो, याचे हे उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

