✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ०९ मार्च २०२६
![]() |
| टी-20 वर्ल्ड कप 2026 अंतिम विजयाचा आनंद साजरा करताना टीम इंडियाचे प्रतीकात्मक दृश्य |
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार खेळ करत न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकत इतिहास रचला. इतकंच नव्हे तर यजमान देश म्हणून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला.
कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक क्रिकेट खेळत चाहत्यांची मने जिंकली. अंतिम सामन्यातही भारतीय संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. विजयाची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर संपूर्ण संघाने मैदानावर जल्लोष करत चाहत्यांसोबत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला.
संबंधित बातमी : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठे बदल; ईशान किशनचे पुनरागमन
भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 255 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 19 षटकांत 159 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने 96 धावांनी विजय मिळवत विश्वचषकावर पुन्हा आपले नाव कोरले.
सॅमसन-अभिषेक-ईशानची आक्रमक फलंदाजी, बुमराहचा घातक मारा
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय डावाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची वेगवान भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव आणला.
अभिषेक शर्माने केवळ 21 चेंडूत 52 धावांची झंझावाती खेळी केली. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत प्रेक्षकांना रोमांचित केले. दुसरीकडे संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकता यांचा उत्तम मिलाफ करत 46 चेंडूत 89 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. मधल्या फळीत ईशान किशननेही अर्धशतक ठोकत भारताचा स्कोअर 250 च्या पुढे नेण्यात मोठा वाटा उचलला.
256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अडचणीत टाकले. टिम सायफर्टने 26 चेंडूत 52 धावांची झुंज दिली, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 43 धावा केल्या. मात्र बाकीचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाहीत.
हेही वाचा : विराट कोहलीचा विश्वविक्रम; मालिकेत भारताचा ऐतिहासिक विजय
भारताकडून जसप्रीत बुमराहने अचूक मारा करत 4 विकेट घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला. अक्षर पटेलनेही 3 विकेट घेत महत्त्वाची साथ दिली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 159 धावांवर बाद झाला आणि भारताने टी-20 वर्ल्ड कप 2026 वर आपली मोहोर उमटवली.

