✍️ लोकवाणी आवाज टिम
📅 ९ एप्रिल २०२६
![]() |
| खरीप 2026 साठी केंद्राचा मोठा निर्णय; खतांचे दर वाढणार नाहीत, शेतकऱ्यांना मोठा दिलासा |
खरीप हंगामाच्या अगदी तोंडावर देशातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या खतांच्या दरामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा आधार मिळणार आहे. केंद्र सरकारने खतांचे दर वाढू नयेत म्हणून मोठा निर्णय घेतला असून, यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते जुन्याच दरात मिळणार आहेत.
८ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. खरीप हंगाम २०२६ साठी खत अनुदान योजना म्हणजेच NBS (Nutrient Based Subsidy) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खतांच्या दरवाढीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
Skymet चा इशारा! 2026 मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
👉 पूर्ण माहिती वाचा
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती वाढल्यामुळे भारतातही दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने अनुदानाची रक्कम वाढवून हा अतिरिक्त आर्थिक भार स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवर ताण येणार नाही.
खरीप हंगाम 2026 साठी खत अनुदानाचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी खत अनुदान लागू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी तब्बल 41,533.81 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे ४,३१७ कोटी रुपयांनी जास्त आहे.
या NBS योजनेअंतर्गत नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) आणि गंधक (S) या पोषक घटकांवर आधारित खतांना अनुदान दिले जाते. यामध्ये DAP आणि NPK सारख्या खतांसह सुमारे २८ प्रकारच्या मिश्र खतांचा समावेश आहे, जे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जातात.
सरकारच्या या निर्णयामुळे खतांचे दर स्थिर राहणार असून, खरीप हंगामातील पेरणी करताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खरोखरच दिलासा देणारा ठरणार आहे.

